पत्र क्र १
बालपणीचा काळ सुखाचा आणि प्रवास पण ! कारण आपल्याला काहीच करावे लागत नसें. आपल्यासाठी तर प्रवास म्हणजे पर्वणीच , रेल्वेनी जाताना मागे पडणारे झाड़ं, शेतं, दूरवर दिसणारे तलाव, जंगल , सतत काहीतरी खाऊ ,...
जगाच्या पाठीवर ... कधितरी कुठेतरी पत्र क्र १ बालपणीचा काळ सुखाचा आणि प्रवास पण ! कारण आपल्याला काहीच करावे लागत नसें. आपल्यासाठी तर प्रवास म्हणजे पर्वणीच , रेल्वेनी जाताना मागे पडणारे झाड़ं, शेतं, दूरवर दिसणारे तलाव, जंगल , सतत काहीतरी खाऊ , बरोबर नेलेला डबा , किती मज्जा असायची. लहान भाऊ तर एक खिड़की अडवून बसायच. हातात वही पेन घेउन . आणि सगळे पुल, रेल्वे क्रॉसिंग आणि बोग़दे मोजायला. पाण्यासाठी फिरकीचा तांब्या. स्टेशन वर भरुन घ्यायचा, फ़िल्टर वगेरे भानगडी नव्हत्याच . उन्हाळयात मात्र मातीचा खोजा म्हणजे सुरई. सामान किती असावे वगेरे बंधने नव्हती. एक होल्डऑल नामक वळकटी नक्की सोबत असायची. काय भरायचे त्यात देवजाणे. प्रवास पण मोठे असायचे. म्हणजे अस बघा, मुंबई हुन नागपुरला जायला एक गाड़ी होती, दादर express. दुपारि दादर हुन साडे बारा ला सूटली की दुसऱ्या दिवशी सकाळी नागपुरला पोचायची. नाशिक पण यायला संध्याकाळ व्हायची. बहुतेकदा आम्ही बच्चे कंपनी मुंबईला मामांकडे राहुन आईबरोबर परत ज़ायचो. प्रचंड सामान असायचे, hold-all, तांब्या , ड़बा तर असायचेच पण नागपुरात तेव्हा न मिळणाऱ्या काही वस्तु म्हणजे नाचनी , कारळ वगेरे पण असायच्या. दादरला मामांनी सर्व डोलारा गाडित चढ़वला की आम्ही छान मज्जा करत प्रवास क़रायचो. इगतपूरी ला वडा घेणे ज़रूरीच होते. नाशिक़ला चिवड़ा. आई त्र्यम्बक ची त्यामुळे तो चिवड़ा ती अगदी आवर्जुन घ्यायची. चाळीसगाव ला एक भेळवाले काका अनेक वर्षे होते. रात्री भुसावळ आणि मग मात्र झोप. सकाळी नागपुर. सगळया सामानासकट बाबा उतरवून घ्यायचे. खुप मज़ा असायची. पण एक प्रवास मात्र हयातला अगदी लक्षात राहिलाय. असेच सर्व सामानासकट दादरला प्रवास सूरू झाला. आम्ही लहान तीन मुले आणि आई, अर्थातच होल्ड ऑल, पाण्याचा खोजा, आणि बाकी सामान . रात्री झोपेपर्यंत सगळ व्यवस्थित पार पडल. सकाळ झाली. बघितल तर गाड़ी कुठेशी थांबली होती, आईच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती. काय झाले कळत नव्ह्त. थोड्यावेळानी कळले गाड़ी पुढ़े जाणार नाही, वर्धा स्टेशन होते ते, म्हणजें एखाद्या तासाचा प्रवास बाकी होता नागपुरसाठी. वाटेत मालगाड़ी घसरून पुढ़े जाणे अशक्य झाले होते. काय करणार? कोणी म्हणे बस सोडत आहेत, चला. एका हमालाच्या मदतीने आई पोचली तिथे. पण सामान आणि लहान मुले घेउन चपळाई करुन बस मधे जागा पकड़ण केवळ अशक्य! तेवढ्यात कोणाच्या तरी धक्क्याने खोजा फुटला. आता पाणी पण नाही. २,३ तास गेले. आईचे प्रयत्न कामी येइनात. तेव्हा, नागपुरचे नामदार गंगाधरराव फड़णविस होते. लोकांना मदत करायला स्वतः आले होते. आमच्या ओळखीचे . मग त्यांनी कंट्रोलर ला सांगून आम्हाला एका बस मधे बसवल, वरून तिथुन वड़िलाना फ़ोन करुन घ्यायला जा सांगीतले. आणि आम्ही नागपुरला पोचलो त्यानंतर मात्र आईने कमीतकमी सामान घेउन प्रवास करण्याचा निश्चय च केला
Written by
कीर्ती वडाळकर
कीर्ती वडाळकर या मुंबई स्थित मराठी लेखिका आहेत. प्रवास, संस्कृती आणि दैनंदिन जीवनातील सुंदर क्षणांवर त्या लिहितात. त्यांची "जगाच्या पाठीवर... कधीतरी कुठेतरी" ही १२५ प्रवास पत्रांची मालिका, जगभरातील अनुभवांचे हृदयस्पर्शी वर्णन करते. प्रत्येक पत्र हे एका प्रवासाची गोष्ट, तेथील माणसांचे, खाद्यसंस्कृतीचे आणि निसर्गाचे जिवंत चित्रण आहे.